उजनीत 29 टक्के उपयुक्त पाणीसाठा, काटकसर गरजेची
जिल्ह्याची वरदायिनी असणार्या उजनी धरणात 15.46 टीएमसी म्हणजेच 29 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. आता उन्हाळा हंगाम सुरू होणार असून पाण्याची मागणी वाढणार आहे. दरम्यान यंदा प्रकल्पातील मृतसाठ्यातील पाणी मोठ्या प्रमाणात वापरावे लागणार आहे.
उजनी धरणातून सध्या सोलापूरसह भीमा नदीकाठच्या योजनांसाठी पाणी सोडण्याचे काम सुरू असून ते आता बंद होईल. रोज 8100 क्युसेक पाणी सोडले जात आहे. आता सोडलेले पाणी किमान तीन महिने पुरवून वापरावे लागणार आहे. यंदा सोलापूर जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने उजनीतून पावसाळ्यापासूनच पाणी सोडले जात असल्याने या धरणात आता जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात 29 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. जवळपास 80 टक्के पाणी संपले आहे. यानंतर आता सिंचनासाठी एक पाणी पाळी सोडावी लागणार आहे. यासाठी किमान पाच टीएमसीहून अधिक पाणी लागते. यातच आता उन्हाळा हंगाम सुरू होत असल्याने बाष्पीभवन ही झपाट्याने होते.
उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा लवकरच संपत असल्याने मृतसाठ्यातील जलसाठा यंदा वापरावा लागणार आहे. या धरणात कागदोपत्री 63 टीएमसी पाणी मृतसाठ्यात आहे. यात गाळ व वाळू ही साठल्याने याचा तंतोतंत अंदाज लागणे कठीण आहे. दरवर्षीच धरणातील मृतसाठ्यातील पाणी वापरावे लागते. परंतु ही वेळ उन्हाळ्यात येते. परंतु यंदा ती लवकरच येण्याची शक्यता आहे. यापूर्वी अवर्षण काळात मृतसाठ्यातील पन्नास टक्क्याहून अधिक पाणी वापरले गेले आहे.