आरक्षणासह विविध मागण्यांसाठी ब्राह्मण समाजाचे आंदोलन

राज्यभरातील ब्राह्मण समाज आपल्या विविध मागण्यांसाठी आज मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनासाठी दाखल झाला आहे. यावेळी त्यांनी शासनाकडे आपल्या मागण्या सादर केल्या. दरम्यान या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे सरकार सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले.
ब्राह्मण समाजाला आरक्षण मिळावे, समाजावर आणि महापुरुषांवर होणारी जातीय चिखलफेक रोखण्यासाठी महापुरुष बदनामी विरोधी कायदा करावा, पुरोहितांना मासिक पाच हजार रूपये मानधन आणि विविध मंदिरात त्यांची नित्यपूजेसाठी नियुक्ती करण्यात यावी, ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहाची सोय करावी, केजी ते पीजीपर्यंत शिक्षण शुल्क माफ करावे, दादोजी कोंडदेव आणि राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची सन्मानपूर्वक पुनःस्थापना करावी, छत्रपती शिवाजी महाराजां यांचे अरबी समुद्रातील स्मारक लवकर पूर्ण करावे, ब्राह्मण समाजातील सेवकांना मिळालेल्या जमिनी वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये बदल करुन त्यांचा मालकी हक्क कायम करण्यात यावा, पहिले पेशवे श्रीमंत बाळाजी विश्‍वनाथ यांच्या श्रीवर्धन येथील जन्मस्थळाचा जीर्णोद्धार आणि स्मारक करावे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न द्यावा. तसेच लंडन येथे ते ज्या घरात राहिले ते भारत सरकारने विकत घेऊन तिथे त्यांचे स्मारक बनवावे, ब्राह्मण समाजातील आर्थिक मागास तरुणांना शैक्षणिक, व्यावसायिक आणि रुग्णाच्या मदतीसाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी. त्यासाठी 500 कोटी रूपयांची तरतूद करावी.
यासह अन्य मागण्यांसाठी ब्राह्मण समाजातील जवळपास चाळीस संघटनांनी एकत्रित येत हे आंदोलन मंगळवारी मुंबईत केले. यासाठी राज्यभरातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातून देखील अनेक समाजबांधव सोमवारी सायंकाळीच मुंबईकडे निघाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!