ऑनलाईन दर्शन शुल्क निर्णय राबवाः मुक्ती दिन कार्यक्रमात मागणी
श्री विठठल-रुक्मिणी मंदिरे समितीने घेतलेल्या ऑनलाईन दर्शन बुकिंग शुल्काला एकमुखाने पाठिंबा दर्शवत या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करणारा ठराव 5 व्या श्री विठ्ठल रखुमाई मुक्ती दिन कार्यक्रमात करण्यात आला. त्याचवेळी देवस्थानच्या सर्व जमिनी ताब्यात घेऊन त्यापासून मिळणार्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत आणि भाविकांच्या सुविधांमध्ये सुधारणा करून आणखी वाढ करण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली.
येथील संत तुकाराम भवन येथे शहरातील विविध सामाजिक, राजकीय, परिवर्तनवादी संघटनांच्यावतीने श्री विठ्ठल-रखुमाई मुक्ती दिन साजरा करण्यात आला. सर्वोच्च न्यायालायाने दिलेल्या निर्णयानंतर 17 जानेवारी 2013 रोजी मंदिरातून परंपरागत बडवे-उत्पात आणि सेवाधार्यांचे हक्क अधिकार संपुष्टात आले होते. त्या दिवसानंतर संपूर्ण देवस्थानचा ताबा राज्य शासन नियुक्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीकडे आलेला आहे. त्या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण म्हणून दरवर्षी परिवर्तनवादी संघटनांच्या माध्यमातून विठ्ठल-रखुमाई मुक्ती दिन साजरा करण्यात येतो. अध्यक्षस्थानी मंदिर समितीचे माजी सदस्य वसंतराव पाटील होते.
गुरूवारी येथील संत तुकाराम भवन येथे यानिमित्त आयोजित कार्यक्रमाची सुरूवात श्री विठ्ठल, रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. तसेच सुरूवातीला चिंचणी ( ता. पंढरपूर ) येथील भजनी मंडळाने भजन सादर केले. यावेळी मंचावर विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष ह.भ.प. अरूण महाराज बुरघाटे, ह.भ.प. भगवान महाराज बागल, प्रा. विजय भोसले आदी उपस्थित होते.
अरूण महाराज बुरघाटे यांनी यावेळी श्री विठ्ठल -मंदिर समितीने ऑनलाईन बुकिंग दर्शनास 100 रूपये शुल्क आकारणीचा घेतलेला निर्णय योग्य असून त्याची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी केली. या निर्णयामुळे मंदिर समितीच्या उत्पन्नात वाढ होऊन भाविकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देता येतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
त्यानंतर झालेल्या खुल्या चर्चा सत्रामध्ये उपस्थित विविध संघटनांचे पदाधिकारी, वारकरी, महिला, युवकांनी मंदिर समितीने घेतलेल्या ऑनलाईन दर्शन बुकिंगचे जोरदार समर्थन केले तसेच कुणाच्याही दबावाखाली येऊन मंदिर समितीने हा निर्णय लांबणीवर टाकू नये तर त्याची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी करणारा ठराव केला. त्याचबरोबर देवस्थानच्या सुमारा 1300 हेक्टरपेक्षा जास्त असलेल्या सर्व जमिनींची शोध घ्यावा, त्यातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत अशीही मागणी केली. पंढरीत येणार्या भाविकांना दर्शन रांगेत अधिक चांगल्या सुविधा दिल्या जाव्यात, अन्नछत्र सोयीच्या ठिकाणी असावे आणि त्यामध्ये पुरेशा प्रमाणात भाविकांना चांगला महाप्रसाद दिला जावा, बहुतांश भाविकांना मठ, धर्मशाळा, मंदिरात रहावे लागते. लॉजमध्ये राहणे परवडत नाही. तेव्हा मंदिर समितीच्या भक्त निवासाचे दर सर्व सामान्य भाविकांना परवडतील अशा प्रकारचे असावेत, पंढरपूरच्या धरतीवर राज्यातील सर्वच देवस्थाने राज्य शासनाने ताब्यात घ्यावीत, त्याठिकाणी शासकीय व्यवस्था निर्माण करावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली. पंढरपूर नगरपालिकेवर वाढत्या भाविकांचा ताण पडत असून मंदिर समितीने स्वच्छता, पाणी पुरवठा, आरोग्य सुविधांवर खर्च करून नगरपालिकेच्या खर्चात वाटा उचलावा अशीही मागणी करणारा ठराव यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमास मोहन अनपट, जेष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे, किरणराज घाडगे, ह.भ.प.दत्तात्रय काळे, सुधाकर कवडे, संदीप मांडवे, विलास भोसले, नितीन बागल, रवी सर्वगोड, सागर चव्हाण, बाळासाहेब बागल, संदीप पाटील, रणजित जगताप, शशिकांत सावंत, शाहजान शेख, ज्ञानेश्वर जवळेकर आदींसह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यम धुमाळ यांनी केले.