शेतमाल तारण कर्ज योजनेत पणन मंडळाचा नवा उच्चांक : ऐतिहासिक कामगिरी
शेतमालाच्या काढणी हंगामात उतरत्या बाजार भावामुळे शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळून शेतकऱ्यास सुगीच्या कालावधीत असलेली आर्थिक निकड विचारात घेऊन त्यांना या गरजेच्यावेळी सुलभ व त्वरित कर्ज उपलब्ध करून देणे हा शेतमाल तारण कर्ज योजनेचा मुख्य उद्देश सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सातत्याने बाजार समित्यांपुढे मांडत प्रभावी अंमलबजावणीचे वारंवार आदेश दिले आहे. त्यामुळे आज शेतमाल तारण कर्ज योजनेत पणन मंडळाचा नवा उच्चांक वाखाणण्याजोगा आहे.
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ राज्यातील शेतक-यांसाठी बाजार समित्यांच्या माध्यमातुन शेतमाल तारण कर्ज योजना राबवित असुन, राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे काढणी हंगामात उतरत्या बाजारभावामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळून शेतकऱ्यांना सुलभ कर्ज उपलब्ध होण्यास या योजनेमुळे मदत होत आहे. चालु हंगाम २०१८-१९ मध्ये केवळ ३ महिन्यात तारणात ठेवलेला शेतमाल व वाटप केलेली तारण कर्जाची रक्कम विचारात घेता सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पणन मंडळाने या योजनेच्या गेल्या २८ वर्षांच्या इतिहासात अग्रेसर कामगिरी करत नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.
राज्यात खरीप शेतमालाच्या काढणीचा हंगाम साधारणत: ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत असुन शेतकऱ्याला असलेल्या आर्थिक गरजेपोटी तसेच स्थानिक पातळीवर शेतमाल साठवणुकीच्या पुरेशा सुविधा नसल्यामुळे सुगीच्या कालावधीत शेतीमाल एकाच वेळी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणला जातो. त्यामुळे या कालावधीत बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक होते. नेमक्या याच कालावधीत शेतमालाचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात खाली आल्याने शेतकऱ्यांना योग्य बाजार भाव मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतमालाची काही कालावधीसाठी साठवणुक करून बाजारभावात वाढ झाल्यानंतर तो विक्रीसाठी आणावा व वाढीव बाजारभावाचा फायदा शेतकऱ्यांनाच व्हावा हा या योजनेचा हेतू आहे.
महाराष्ट्र राज्यकृषि पणन मंडळाच्या शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बाजार समिती अथवा वखार महामंडळाच्या गोदामात ठेवलेल्या शेतमालाच्या एकुण किंमतीच्या ७५ टक्के पर्यंतची रक्कम ६ महिने कालावधीसाठी ६ टक्के व्याज दराने तारण कर्ज देण्यात येते. या योजनेमध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, चना, भात (धान), करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, वाघ्या घेवडा (राजमा), काजू बी, बेदाणा, सुपारी व हळद इ. शेतमालासाठी तारण कर्ज देण्यात येते. तसेच शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यासाठी स्वनिधी उपलब्ध नसलेल्या बाजार समित्यांना रू. ५ लाख इतका अग्रिम निधी पणन मंडळाकडून देण्यात येतो. या व उर्वरित बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना वाटप केलेल्या तारण कर्जाची १०० टक्के प्रतिपूर्ती महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत करण्यात येते.
राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्या व शेतकरी यांच्या सहभागाने महाराष्ट्रराज्यकृषि पणन मंडळ माहे ऑक्टोंबर ते सप्टेंबर या कालावधीत दर वर्षी शेतमाल तारण कर्ज योजना राबवते. यामध्ये काही बाजार समित्या हंगामाच्या अगदी सुरुवाती पासून म्हणजे ऑक्टोंबर – नोव्हेंबर पासून तारणाचा माल घेण्यास सुरूवात करतात. तर काही बाजार समित्या योजनेच्या कालावधीत टप्प्या टप्प्याने योजनेत सहभागी होतात. यामध्ये प्रामुख्याने त्या त्या तालुक्यात उत्पादित होणा-या शेतमालाचा काढणी हंगाम महत्त्वाचा ठरतो.
पणन मंडळाने गेल्या २७-२८ वर्षापासून या योजनेची अंमलबजावणी सुरु केली आहे. महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ हे शेतमाल तारण कर्ज योजना राबवणारे देश पातळीवरील एकमेव कृषि पणन मंडळ आहे. याची नोंद केंद्र शासनामार्फत घेण्यात आलेली आहे.
पणन मंडळामार्फत १५ जानेवारी पर्यंतच्या योजनेच्या अंमलबजावणीत ऑक्टोंबर ते सप्टेंबर या संपुर्ण १२ महिन्याच्या हंगाम कालावधीत राबवलेल्या तारण योजनेची कमाल आकडेवारी खालील प्रमाणे आहे.
• तारणयोजनेतसहभागीबाजारसमित्यांचीकमाल संख्या १३८.
• तारणयोजनेतसहभागीशेतकऱ्यांचीकमाल संख्या ५४८४.
• तारणात ठेवण्यात आलेल्या शेतमालाचे कमाल वजन २,२५,३४९ क्विंटल.
• शेतक-यांना वाटप केलेल्या तारण कर्जाची कमाल रक्कम रु. ४५.२२ कोटी.
चालू हंगामात माहे ऑक्टोंबर २०१८ पासून दि. १५ जानेवारी २०१९ या केवळ सव्वातीन महिन्याच्या कालावधीत तारण योजनेची आकडेवारी खालील प्रमाणे आहे.
• तारण योजनेतसह भागी बाजार समित्यांची संख्या १३७.
• तारण योजनेत सहभागी शेतकऱ्यांची संख्या ८०५५.
• तारणात ठेवण्यात आलेल्या शेतमालाचे वजन ३,३४,१०४ क्विंटल.
• शेतक-यांना वाटप केलेल्या तारण कर्जाची रक्कम रु. ६७.३४ कोटी.