विठ्ठल मंदिराचे होणार स्ट्रॅक्चरल ऑडिट
येथील विठ्ठल मंदिराच्या मूळ वास्तूवर नंतरच्या काळात झालेल्या अवास्तव बांधकामामुळे ताण आला असून तो धोकादायक आहे. ही चुकीची बांधकामे हटवून गाभार्यातही काही बदल केल्यानंतर मंदिर आणि मूर्तीचे संवर्धन होण्यास मदत होईल असा दावा पुरातत्व विभागाच्या पुण्यातील अधिकार्यांनी केला आहे. विठ्ठल मंदिराचे आता स्ट्रक्चरल ऑडिट होत असून याचा अहवाल मंदिर समितीला दिला जाणार आहे.
विठ्ठल मंदिराच्या छतावर टाकण्यात आलेले स्लॅब आणि अनेक ठिकाणी केलेली बांधकामे यामुळे छतावरील वाढलेला बोजा मूळ मंदिरावर येत असून यामुळे या वास्तूस धोका निर्माण होवू शकतो. आता संपूर्ण मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट करायचे काम पुरातत्व विभाग हाती घेणार आहे. यानंतर येथे नेमके काय बदल करावे लागतील याचा अहवाल ते श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीला आहेत . राज्य पुरातत्व विभागाचे औरंगाबाद येथील सहायक संचालक विलास वहाणे आणि त्यांच्या पथकाने रविवारी विठ्ठल मंदिराची पाहणी केली.
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचा जीर्णोध्दार हा पुरातन शैलीतच करण्याचा मानस मंदिर समितीचा आहे. यासाठी समितीने पुरातत्व खात्याकडे परवानगी मागितली होती. मात्र हे मंदिर ना राज्याच्या ना केंद्राच्या पुरातत्व यादीत असल्याचे पुरातत्व विभागाने कळविले होते. यानंतर ही समितीने मंदिराचा विकास करताना पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानेच पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुरातत्व विभागाचे अधिकारी पाहणीसाठी येथे आले आहेत. आता या मंदिराच्या स्ट्रॅक्चरल ऑडिटसाठी किमान एक महिना लागणार असून यानंतर याचा अहवाल समितीला दिला जाईल. यापूर्वी ही पुरातत्व विभागाच्या अधिकार्यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराची पाहणी केली होती.
पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर हे अकराव्या शतकातील असल्याचे मानले जाते. अभ्याकांच्या मते हि वास्तू त्याही पूर्वीची असावी . मूळ मंदिराचे बांधकाम संपूर्ण दगडी पद्धतीने झाले असून ते यादवकालीन असल्याचे सांगितले जाते. वास्तविक मंदिर जरी अकराव्या शतकातील असले तरी यानंतरच्या काळात मंदिराच्या शिखराचे काम झाले असल्याचा अंदाज पुरातत्व विभागाचा आहे . यानंतरच्या काळात मात्र मूळ मंदिराच्या छतावर जाडजूड स्लॅब टाकण्यात आल्याने मंदिरावरचा बोजा मोठ्या प्रमाणात वाढला आहे . यातच मंदिरात हवा येण्यासाठी छतावरील अनेक ठिकाणाची मूळ दगडे काढून तेथे हवा बाहेर जाण्यासाठी मोठ्या आकाराची सवणे केल्याने वास्तूचे छत कमकुवत झाले आहे . यातच छतावर विविध प्रकारची बांधकामे , वातानुकूलित यंत्रणा यामुळे बोजा बोजा वाढला आहे . यामुळे मंदिराचे दगडी खांब ही खराब होण्याची भीती आहे.
हे मंदिर उभारले होते तेंव्हा विठ्ठल गाभारा , चौखांबी आणि सोळखांबी एवढेच मर्यादित होते ,मात्र नंतरच्या काळात मंदिराचा विस्तार झाला आहे . मंदिराचा मुख्य भाग असणार्या विठ्ठल गाभार्यात देखील नंतरच्या काळात अस्ताव्यस्त दुरुस्त्या केल्याने मूळ वास्तूच्या ढाच्यालाच धोका निर्माण होवू पहात आहे. गाभार्यात भितींवर लावलेल्या ग्रॅनाईट व संगमरवरी फरशीमुळे गाभार्यात निर्माण होणारी आर्द्रता मूर्तीस घातक बनू लागली आहे . गाभार्यात अनेक ठिकाणी मूळ वास्तूच्या स्वरूपाचं सुधारणेच्या नावाखाली झाकून टाकल्याने आता हे सर्व पूर्ववत करावे लागेल असे पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे . मंदिरातील दगडांना दिलेले रंग दगडी, वास्तवात इतर नव्या बांधकामांचे टाकलेले बोजे , धोकादायक वायरिंग हे सर्व घटक अकराव्या शतकातील मूळ मंदिरासाठी धोकादाय आहेत . याबाबत तातडीने संपूर्ण मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे काम पुरातत्व विभाग हाती घेत असून याचा अहवाल समितीसमोर ठेवला जाणार आहे. मात्र विठ्ठल मंदिर हे केंद्र आणि राज्य यापैकी कोणत्याच पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत नसल्याने अशा पद्धतीची धोकादायक आणि मारक बांधकामे होत आली आहेत . आता या संपूर्ण मंदिराचा ताबा राज्य सरकारचा झाल्यावर तरी हे मंदिर पुरातत्व विभागाच्या ताब्यात देण्याची मागणी मंदिर समितीचे सदस्य शिवाजीराव मोरे यांनी केली आहे.
यावेळी मंदिरात सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.