वारकर्‍यांच्या सुविधांसाठी विठ्ठल मंदिराचे उत्पन्न वाढवू या

देशात व राज्यातील अनेक तीर्थक्षेत्रांचे उत्पन्न हे कोट्यवधींच्या घरात असून तेथे अनेक भाविकोपयोगी उपक्रम तेथील मंदिरांकडून राबविले जात आहेत. परंतु पंढरीच्या विठ्ठलाला सतत गरीबांचा देव असे संबोधत येथे अनेक चांगल्या गोष्टींना विरोध केला जातो. हे आता थांबणे गरजेचे बनले असून देवाच्या ऑनलाइन दर्शनाबरोबरच येथे येणार्‍या व्हीआयपींकडून जलद दर्शनासाठी शुल्क आकारल्यास वारकर्‍यांसाठी अनेक योजना राबविण्यासाठी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीला निधी प्राप्त होवू शकतो.
नुकत्याच मंदिर समितीच्या एका बैठकीत सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व अन्य सदस्यांनी ऑनलाइन दर्शनासाठी शुल्क आकारण्याचा प्रस्ताव सादर केला. यास नेहमीप्रमाणे काही महाराज मंडळींनी नंतर विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र सध्याची जनभावना पाहता सशुल्क ऑनलाइन दर्शनाला अनुकूल असणार्‍यांची संख्या ही मोठी आहे तर विरोध करणारे मुठभरच आहेत. यापूर्वी या मंदिरात व्हीआयपी दर्शनासाठी शंभर रूपये शुल्क आकारण्याची योजना आखण्यात आली व याची अंमलबजावणी सुरू होताच काही जणांनी विरोधाचा सूर काढला व नंतर ती महत्वकांक्षी योजना बारगळली.
राज्यातील अन्य देवस्थानांमध्ये असा विरोधाचा सूर कधी पाहावयास मिळत नाही व सतत वादाचे प्रसंग ही तेथे उद्भवत नाहीत. परंतु पंढरीतच अशा अनेक वादविवादांना सुरूवात केली जाते. येथे सोयी सुविधांची मागणी ही केली जाते आणि सशुल्क ऑनलाइन दर्शनाला विरोध करणारी ही मंडळी आहेत. श्री विठ्ठल मंदिराचे उत्पन्न अन्य देवस्थानांच्या तुलनेत कमी असल्याने येथे समितीला उपक्रम राबविता अडचण निर्माण होते. तीनशेहून अधिक कर्मचारी या समितीत काम करीत असून त्यांचे वेतन, नित्य खर्च समितीला भागवावे लागतात. आषाढी ,कार्तिकी व अन्य यात्रा काळात मंदिराला चांगले उत्पन्न मिळते.
दरवर्षी पंढरीनाथाच्या दर्शनासाठी एक ते सव्वा कोटी भाविक देशभरातून येतात. येथे येणारे सर्वच भाविक हे ग्रामीण भागातील नसून शहरी व निमशहरातून मोठ्या प्रमाणात विठ्ठल भक्त येथे येत असतात. सध्या आधुनिक युग असल्याने सर्वत्रच ऑनलाइनचा बोलबाला आहे. मंदिर समितीने ही विठ्ठलाच्या दर्शनाची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यास इतका चांगला प्रतिसाद आहे की वर्षभरात बारा ते तेरा लाख लोक याचा लाभ घेत आहेत. हे सर्व मध्यमवर्गीय व श्रीमंतच असल्याचे दिसून येते. ऑनलाइन दर्शन बुकिंग करणार्‍याला पंढरीत आल्यावर तत्काळ दर्शन मिळते. जर यासाठी शंभर रूपये नाममात्र शुल्क आकारल्यास यातून समितीला प्रतिवर्षी बारा कोटी रूपयांहून अधिकचे उत्पन्न मिळू शकते. सध्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती अनेक भाविकोपयोगी उपक्रम राबवित आहे. नुकतेच ऐंशी कोटी रूपये खर्च करून 350 खोल्यांचे भक्तनिवास साकारण्यात आले  आहे. याच बरोबर मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग व चंद्रभागा वाळवंटाच्या स्वच्छतेसाठी प्रतिवर्षी मंदिराच्या वर्षी दीड कोटी रूपये खर्च केले जातात. याचा ठेका देण्यात आला आहे. शहरात वॉटर एटीएम उभारण्यात आले आहेत. ज्यामुळे भाविकांना मिनरल वॉटरच्या बाटल्या घेण्यासाठी पैसा खर्च करावा लागत नाही. अन्नछत्र सुरू असून याचा लाभ सर्वसामान्य भाविक रोज घेत आहेत. येथील भोजनाच्या पदार्थात वाढ करण्यात आली आहे. एकादशीला उपवासाचे पदार्थ पुरविले जातात. यात्रा कालावधीत चहा, खाद्य पदार्थ, शुध्द पाणी हे सारे मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगेत देण्याची सोय केली जात आहे. यासाठी मोठा खर्च होत असतो व यासाठी समितीला निधीची गरज असते.
अनेक दानशूर अलिकडे श्री विठ्ठल चरणी देणग्या देत आहेत. मागील दोन वर्षात यात वाढच होत आहे. अनेकजण पंढरीत भाविकोपयोगी योजनांसाठी निधी देण्यास तयार होत आहेत. अशा वेळी पंढरपूरकरांनी ही आता सकारात्मकता बाळगत समितीच्या कामाला मदत करणे आवश्यक बनले आहे. ऑनलाइन दर्शन घेणारी मंडळी ही सधन असतात त्यांच्याकडून शंभर रूपये नाममात्र शुल्क आकारण्यास त्यांचा ही विरोध नाही. तसेच आता पंढरीत जी व्हीआयपी मंडळी दर्शनासाठी येतात त्यांच्याकडून ही समितीने शुल्क आकारल्यास आणखी निधी येथे उपलब्ध होवू शकतो. रोज अनेकजण व्हीआयपी दर्शनाचा लाभ घेतात.
पंढरपूर व श्री विठ्ठल मंदिर परिसराचा विकास व्हावा यासाठी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले हे प्रयत्नशील असून अनेक दानशूर व्यक्ती व संस्थांना ते यासाठी आवाहन करत असतात. कॅनडा सरकार मैत्रीचे प्रतीक म्हणून पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या विकासात सहभागी होण्यास तयार आहे. यासाठी ही  डॉ.भोसले यांचे काम सुरू आहे. राज्य सरकारने त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे. येथे संत तुकाराम विद्यापीठ स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत, यासाठी समिती ही गठीत करण्यात आली आहे. आगामी काळात मंदिर व वाळवंटाचे ही सुशोभिकरण करण्याचा मानस आहे. याच बरोबर भाविकांच्या सोयीसाठी ही अनेक उपक्रम मंदिर समिती हाती घेण्याच्या तयारीत आहे.
राज्यातील शिर्डीसह अन्य देवस्थानांचा विचार केला तर तेथे विकासकामे ही मंदिरांच्या वतीने पूर्ण होत आहेत. तेथे येणार्‍या भाविकांना सर्व सोयी सुविधा सहज उपलब्ध होत असल्याने भाविकांचा ओढा त्या तीर्थक्षेत्रांकडे वाढत आहे. यामुळे तेथे व्यापार वाढून ती शहर व गावे ही आर्थिकदृष्ट्या संपन्न बनली आहेत. शिर्डी देवस्थान तर राज्य सरकारला ही योजना राबविण्यासाठी निधी देत आहे. दुष्काळ निवारणासाठी कोट्यवधी रूपये त्यांनी देवू केले आहेत. त्या मानाने पंढरीनाथाचे उत्पन्न खूपच कमी आहे. पंढरीच्या विकासासाठी सर्वतोपरी शासनावरच अवलंबून रहावे लागत आहे. अलिकडे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीने स्वच्छता, पाणी यासाठी शहरात योगदान देण्यास सुरूवात केली आहे. या मंदिराचे उत्पन्न वाढले तर शहराबरोबरच भाविकांना ही याचा उपयोग होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!