वारीतील पर्यावरण रक्षक सेंद्रिय खताचे मोफत वाटप
थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच व कमिन्स इंडिया फाउंडेशन यांच्या वतीने आळंदी-देहू-पंढरपूर वारी मार्ग कायमस्वरुपी प्लास्टिक-थर्माकोल कचरामुक्त व्हावा यासाठी प्लास्टिक थर्माकोल कचरामुक्त दिंडी अभियान राबविण्यात येत आहे. सन 2018 च्या वारीमध्ये पाणी बचत व वारकर्यांचे आरोग्य रक्षण, पर्यावरण रक्षण यासाठी पत्रावळ चळवळ उभी राहिली. या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या कंपोस्ट खताचे वितरण शेतकर्यांना करण्यात आले.
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी वारीमार्गावरील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व सोलापूर विद्यापीठ तसेच विविध सामाजिक संस्था, ग्रामपंचायत यांच्या सहभागाने वारी मार्गावर वारी काळात 68 लाख नैसर्गिक पानांची पत्रावळ व 80 लाख द्रोण याचा वापर झाला. संस्थेने वारीमित्रांच्या सहकार्याने वापरापश्चात यांचे संकलन केले. वारी काळात श्री विठ्ठल-रुक्मिणी तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणी अर्पण झालेले हार-पान-फुले संकलित करून माळशिरस येथे त्याचे व पत्रावळीचे गायीच्या शेणाचा वापर करून उत्कृष्ट कंपोस्ट खतात रुपांतर केले. सदर खताचे शेतकर्यांना वितरण करण्यात आले.
यात्रा काळात विविध शाळा-महाविद्यालयात पर्यावरण रक्षणासाठी आणि पाणी बचतीसाठी प्रबोधन करण्यात आले. पंढरपूर नगरपरिषदेच्या सर्व शाळांमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यातील विजेते व वारीमित्र यांना सन्मानित करण्यासाठी एका कार्यक्रमाचे योग भवन पंढरपूर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ह.भ.प. वा.ना. उत्पात व देवव्रत राणा महाराज वासकर, मोहन मंगळवेढेकर, डॉ. अरुण मेणकुदळे उपस्थित होते.
यावेळी कमिन्स इंडिया फाउंडेशनच्या अवंती कदम यांच्या हस्ते शेतकर्यांना खतांचे वितरण करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते वारीमध्ये काम करणार्या कार्यकर्त्यांना थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच या संस्थेने वारीमित्र प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कंपोस्ट खताचे समीक्षण करताना कृषितज्ज्ञ व प्रगतशील शेतकरी प्रा. राजेंद्र सांबरे यांनी पत्रावळीपासून तयार झालेल्या या खतामध्ये उत्कृष्ट सेंद्रीय कर्ब निर्माण झाले असल्याचे सांगितले.
थं क्रिएटिव्ह व कमिन्स इंडिया फाउंडेशन यांच्या या उपक्रमामुळे वासकर फडातील सर्व दिंड्यांनी प्लास्टिक थर्माकोल वापर 100 टक्के बंद करून नैसर्गिक पानांची पत्रावळ वापरास सुरुवात केली आहे. तसेच या संस्थांनी पानांची पत्रावळची गुणवत्ता सुधारण्यास व वापर वाढीसाठी अथक परिश्रम घेतल्याचे प्रतिपादन देवव्रत राणा महाराज वासकर यांनी केले.
मानवाने निसर्गाच्या जवळ जाऊन निसर्गाशी एकरुप होऊन पहिल्या काळातील असलेले निसर्गाचे दृष्य व आताची वस्तुस्थिती यांची तुलना करून आपणाकडून झालेल्या चुका सुधारून आनंद घ्यावा. त्यासाठी थं क्रिएटीव्ह व कमिन्स इंडिया फाउंडेशन खूप चांगले उपक्रम राबवत आहेत असे वा.ना. उत्पात यांनी सांगितले. कमिन्स इंडिया फाउंडेशनचे प्रशांत चितळे म्हणाले की, तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी निर्माण होणारे निर्माल्य हे वेस्ट गोल्ड आहे. वेळीच पंढरपूर नगरपरिषदेने लक्ष दिले तर त्यातून सुद्धा सोन्याची निर्मिती करून आपण त्याचे परिसरातील शेतकर्यांना त्याचे वितरण करू. संस्थेचे अध्यक्ष प्रशांत अवचट यांनी प्लास्टिक थर्माकोल कचरामुक्त दिंडी अभियानाची कार्यपद्धती व फलश्रुतीची माहिती उपस्थितांना यावेळी दिली.
या बक्षीस वितरण व वारीमित्र सन्मान सोहळ्यास पंढरपूरचे उपनगराध्यक्ष विशाल मलपे, नगरसेवक विवेक परदेशी, रोटरी क्लबचे अध्यक्ष जयंत हरिदास, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे चंद्रकांत काळे, माळशिरसचे अॅड. प्रभाकर कुलकर्णी,अनिल कुलकर्णी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रदीप कुलकर्णी आणि विशाल आर्वे यांनी केले, तर आभार उमेश वायचळ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वारीमित्र संभाजी शिंदे, सूरज पावले, राजेंद्र अनारसे, सारंग दिगे, ऋषिकेश कंबीरे, चैतन्य कांबळे, आशिष धर्माधिकारी, रोहन जडे यांनी परिश्रम घेतले.